December 31, 2009

Grow up, Mr Parulekar !

प्रिय वाचकहो,
’राजू परुळेकर’ नामक सद्गृहस्थांनी लिहिलेल्या सचिन तेंडुलकर वरील ’या’ दोन लेखांस प्रत्युत्तर म्हणून हा लेख प्रपंच.

लोकप्रभा मध्ये प्रकाशित झालेले हे लेख येथे वाचा -


http://www.loksatta.com/lokprabha/20091127/alkem.htm
http://www.loksatta.com/lokprabha/20091218/alke.htm

लेख लिहिण्या पूर्वी मला काही disclaimers देणे आवश्यक वाटते -

१. मी सचिन तेंडुलकरचा चाहता आहे. त्याची खेळण्याची शैली पाहून मला आनंद होतो. त्याने भारतीय क्रिकेट रसिकांस आनंदाचे आणि अभिमानाचे अनेक क्षण दिले आहेत, त्यासाठी मी सचिन चा ऋणी आहे.

२. मी सचिनला ’देव’ समजत नाही. मानव आणि देव यांत फरक आहे हे मला ठाऊक आहे !

३. मला क्रिकेट विलक्षण आवडते, आणि पुरेशा प्रमाणात समजते. मी या विषयातील तज्ञ मात्र अजिबात नाही.

४. हा लेख लिहिण्यासाठी सचिन वा त्याच्या कोणत्याही चाहत्याने मला कोणत्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही ;)

५. मी जरी सचिनचा चाहता असलो तरी माझी सदसद्विवेक बुद्धी ही अधिक महत्वाची असल्याने हा लेख ’आंधळी व्यक्तिपूजा’ अजिबात नाही. किंबहुना या लेखात मी शक्य तेवढे वस्तुस्थितीस प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला आहे.

६. हा लेख म्हणजे सचिन चे गोडवे गाण्याचा कार्यक्रम नसून परुळेकर साहेबांचे जे मुद्दे मला पटले नाहीत तेवढेच खोडण्याचा प्रयत्न आहे.

उद्देश :


लेखाच्या सुरुवातीसच मी माझा इरादा स्पष्ट करू इच्छितो.
श्री परुळेकर यांनी लिहिलेला हा जो ’आचरट’ लेख आहे, त्याच्या line-by-line चिंध्या करणे हा माझा उद्देश आहे.

सचिन - मानवजातीचा तारणहार ?
परुळेकर साहेब म्हणतात - "सर्व माध्यमांनी सचिन च्या वाढदिवशी असा थाट केला होता की जणू सचिन हा मानवजातीचा एकमेव तारणहार आहे". कोणी सांगितले तुम्हाला ’जणू’ प्रकरण ? आता आपण एकेक शब्द पाहू.
"मानवजातीचा तारणहार" - माध्यमांतील कुठल्या वाक्यांनी आपल्याला असे वाटले ? थोडी अधिक माहिती द्या ना ! "तारणहार" कोणाला म्हणतात ठाऊक आहे का ? आपल्या लाडक्या खेळाडूचे कौतुक केले म्हणजे त्याला आपण "तारणहार" समजलो असे तुम्हाला कोणी सांगितले ? तुमच्याच कानात वा स्वप्नात येऊन सांगितले का ?

माध्यमांनी अती कौतुक केले ही झाली ’फॅक्ट’

आणि ’तारणहार’ हे झाले तुमचे ’परसेप्शन’. तुमच्या अकलेचे तारे. पिरिअड.


परुळेकर साहेब, तुमची १९ वर्षांची कारकीर्द झाली, आता तरी ’फॅक्ट’ आणि ’परसेप्शन’ यांत फरक करायला शिका.

पुढचा शब्द - "एकमेव". पुन्हा तेच. सचिन चे एक दिवस कौतुक केले, म्हणजे बाकी सर्वांना दुर्लक्षित केले असा अर्थ होतो का काय ? मग २६/११ ला हुतात्म्यांची आठवण केलेली दिसली का तुमच्या डोळ्यांना ? मग अजूनही "एकमेव" शब्द वापरणार का वरच्या वाक्यात ?

बहुसंख्य जनतेचे तसे मत नसेलही
जर तर. बहुसंख्य जनतेचे काय मत आहे हे तुम्हाला माहीत आहे ? नाही ना, असेल नसेल मधे बोलताय ना, मग कशाला तोंड उघडताय ? ’तुमच्या स्वत:बद्दल’ बोला. ’बहुसंख्य जनते बद्दल’ काडीचा ’स्टॅटिस्टिकल डेटा’ नसताना ’उचलली जीभ’ कशाला ?

नैसर्गिक, कृत्रिम आणि अभिजात
आपल्याला शेत कसणारा शेतकरी पाहून आनंद वाटतो ना ? मग नाचा. तुमच्या आनंदात माझा पण आनंद आहे. प्राजक्ताच्या फुलांचा पडलेला सडा पाहून वा पिसारा फुलवून नाचणारा मोर पाहून माझंही मन मोहरतं. पण प्रत्येक गोष्टीतला आनंद निराळा. एका विनोदी लेखकांनी (बहुधा अत्रे, चू भू द्या घ्या), ’पाठ खाजविण्यातला आनंद’ या विषयावर भाष्य केले आहे. तुमचं माहीत नाही, पण मला पाठ खाजत असेल तर त्या वेळेस पाठ खाजवून आनंद मिळतो, शेतकरी पाहून वा मोर पाहून नाही. क्रिकेटचे वेगळे स्थान आहे, मोराचे वेगळे आणि शेतक-याचे वेगळे.

बरं, निसर्ग आवडतो तुम्हाला. निसर्ग चित्रे आवडतात ? का ती कृत्रिम ? मी युरोप नाही पहिलेला. पण मग लोकांनी घेतलेले युरोपाचे फोटो पाहून मला आनंद वाटतो. मग फोटो ग्राफी पण कृत्रिमच ना ?

आणि अभिजात आनंद काय असतो हे ठरवायची घाई करू नका. एखादा अध्यात्मिक वृत्तीचा माणूस, ’ही सगळी माया आहे’ वा ’हे सगळं अशाश्वत आहे’ असं म्हणून तुमच्या ’नैसर्गिक’ आनंदाला कदाचित टाचणी लावेल !

सचिन महान का ?
सचिन ला डोक्यावर घेण्यात तुम्हाला एक समस्या दिसतिये, ती म्हणजे ’क्रिकेट हा विरंगुळा आहे’. लोकांना सचिन का आवडतो मला माहीत नाही. पण मला सचिन का आवडतो यातले एक कारण आहे ते म्हणजे सचिन पाशी जे क्रिकेट कौशल्य आहे त्याचा अंशही मजपाशी नाही. एखादी गोष्ट, जी मला ठीकशी जमत नाही तीच गोष्ट सचिन जर अतिशय लीलया करू शकत असेल तर त्याचे कौतुक नाही वाटणार तर काय वाटणार ? कदाचित काही लोकांना द्वेष वाटू शकेल ;)

ग्लॅडिएटर
आपली ग्लॅडिएटर ची उपमा वाचून हसावे का रडावे हे कळले नाही. त्या खेळात क्रौर्य होते, हत्या होती. त्यांतले बहुसंख्य योध्ये स्वत:च्या इच्छेने नव्हे तर जुलूम जबरदस्तीने मैदानात उतरवले जात. आणि हा खेळ पाहून मिळणारा आनंद - क्रौर्य आणि विकृतीने लिडबिडलेला होता.
तुम्हाला काय म्हणायचंय ? एका माणसाने दुस-याच्या छातीत तलवार भोसकणे आणि फलंदाजाने कव्हर ड्राईव्ह मारणे या सारख्या गोष्टी आहेत ? सिंहाने माणसाला फाडणे आणि यॉर्करने स्टंप उखडणे एक आहेत ?
आणि लोकांकडे भाकरी नाहीये म्हणून लोकांचे लक्ष वळवायला क्रिकेट खेळतात ? ज्यांना पोट भरायला दोन घास नाहीयेत ते स्टेडिअम वर नाहीतर टी व्ही वर क्रिकेट बघतात असं तुम्हाला म्हणायचंय ? एक काम करा, दोन दिवस उपास करा। मग म्हणाल, "ती मॅच गेली खड्ड्यात, मला खायला हवंय!" बघा पटतंय का !

तुम्ही ’गिबन’ वाचलाय ते चांगलं आहे. पण म्हणून ’गिबन ची (नसलेली) शेपटी’ भलतीकडे जाऊन जोडू नका !


बर मी क्रिकेट पाहतो. पण मी सत्ताधीशही नाही, ’सट्टा’धीशही नाही आणि उपाशी पण नाही. मग मी क्रिकेट का पाहतो ? तुमच्या म्हणण्या नुसार जनतेत सत्ताधीश आणि उपाशी एवढेच दोन ’क्लासेस’ आहेत काय ? अहो, हे २००९ साल आहे, आपल्या इकडे लोकशाही आहे असं ऐकिवात आहे आमच्या !

’शरद पवार हे सचिन आणि क्रिकेट मधे रस घेऊन देशाला आणि स्वत:ला जनतेच्या भुके कंगालपणाचा विसर पडायला लावतात"
ROTFL

जमिनीवर गडबडा लोळून हसावसं वाटतंय मला !!

परत, ’फॅक्ट्स’. देशातले किती लोक ’भुके कंगाल’ आहेत (माझ्या माहिती नुसार सुमारे ३५ % लोक खाऊन पिऊन सुखी नाहीत) ? किती लोक क्रिकेट पाहतात ? आणि सगळ्यात महत्वाचं - क्रिकेट बंद केलं समजा, तर ही परिस्थिती बदलणार आहे ? मग क्रिकेट आणि सचिन वर आगपाखड कशाला ?
याचा अर्थ भारतातील गरीब/ भुकेल्या लोकांबाबत मी संवेदनशील नाही असा अजिबात नाही. पण मग भुकेल्या लोकांची पर्वा करताना तुम्हाला फक्त क्रिकेटच कसं दिसतं ?

क्रिकेट, सचिन, मानवता, समाज सेवा आणि ...
सचिन ने मानवजातीचे काय भले केले आहे ?
सचिन मुळे मानवजातीला कोणते वरदान प्राप्त झालंय ?

असं मानून चालू ( Assuming without admitting ) - सचिन ने मानवजातीचे कोणतेही भले केलेले नाही. सचिन मुळे मानवजातीला कोणतेही वरदान मिळाले नाहीये. बर मग ? So what ? म्हणून त्याने जे काही मिळवलं आहे, कौशल्य कमावलं आहे, त्याने क्रीडा रसिकांचे मन रिझवलं आहे, त्याच्या - आणि एका भारतीयाच्या नावावर अनेक विक्रम झाले, त्याची किंमत शून्य होते ? स्वत:चे वडील गेल्यावर सचिन धडपडत इंग्लंडला परतला - विश्वचषकाच्या वेळी - ते काय वैयक्तिक विक्रमांसाठी, का पैशासाठी ?

आपले दोन राष्ट्रपती सुखोईमधे बसले। त्यात कलामसाहेब पण आलेच. (तुम्हाला शास्त्रज्ञांचा फार आदर आहे, म्हणून सांगितले !) त्याने मानवजातीचा कुठला फायदा झाला ? किती रुपये लागले त्या उड्डाणांना माहितेय ना ? मग सचिनच का दिसतो ? :)


सचिन हेमलकसाला नसेल गेला. प्रत्येकाने हेमलकसाला गेलेच पाहिजे का ? पूर्वी राजदरबारात कलाकारांना आश्रय मिळे. तो कशाला ? सवाई गंधर्व च्या मंडपात कधी आला असाल. भीमसेन जोशींना संगीतरसिक कसे मान देतात ते पाहिलंय ? भीमसेन जोशींनी गाणं गायल्याने कोणाचे पोट भरलेले नाहीये. मग त्यांच्या संगीतसाधनेची किंमत शून्य ? त्यांना मिळालेले भारतरत्न गैर ? लक्षात ठेवा, रत्न पाहून पोट भरत नाही. पण रत्न हे रत्न असते. पण त्याची किंमत पारख्यास कळते. गाढवांना गुळाची चव तशीही समजत नाही.


समाजसेवा आणि मनोरंजन यांना स्वत:चे स्थान आहे। मी जेव्हा ऑफिसमधून थकून घरी येतो, तेव्हा मला संगीत ऐकून प्रसन्न वाटते. तेव्हा मी समाजसेवेच्या मूड मधे नसतो. जगात ’समाजसेवा’ एवढीच दखलपात्र गोष्ट आहे असे नाही. तसं तुम्हाला वाटत असेल, तर एक किस्सा सांगतो, तो वाचा -


रामकृष्ण परमहंस भक्तांसह बोलत असतां त्यांनी सांगितले - "तुम्हांला एक गोष्ट विचारतो. जर ईश्वर तुमच्या समोर येऊन दर्शन देईल तर तुम्ही त्याची इच्छा धराल की कित्येक हॉस्पिटलांची इच्छा धराल ? जे इस्पितळं दवाखाने करतील आणि त्यांतच आनंद मानतील तेही चांगले लोक होत, परंतु त्यांचा वर्ग वेगळा. जो शुद्ध भक्त असतो, त्याला ईश्वराखेरीज आणखी काहीही नको असतं". (रामकृष्ण वचनामृत)


बर. आता रामकृष्ण हेमलकसाला गेले नाहीत म्हणून त्यांना पण चावणार का ? :)

इथे प्रत्येक माणूस काही ना काही उद्देशाने जन्मलाय. त्याने त्याला पूर्ण न्याय दिला तरी पुरे.

तुम्ही ज्याला अभिजात समजताय त्याची विरक्तपणे उपेक्षा करणारा माणूसही तुम्हाला भेटेल.

क्रिकेट पाहून मिळणारा आनंद आणि मोर पाहून मिळणारा आनंद निराळा. क्रिकेट मधे थरार आहे, उत्तेजना आहे. परीक्षेत पास झाल्याचा आनंद वेगळा, पगार वाढ मिळाल्याचा वेगळा, मूल झाल्याचा वेगळा, आपल्याला चावणारा डास मारल्याचा वेगळा, गाणं ऐकल्याचा वेगळा आणि आपला देश मॅच जिंकल्याचा वेगळा. पण सगळेच आनंद हवेसे असतात. आपापल्या वृत्तीनुसार.

आपण जेवणाचे ताट घेतो तेव्हा त्यात सगळे गोडच पदार्थ असतात का ? त्यात खारट, तुरट, आंबट, तिखट चवी असतात ना ?
सात्विक आणि आरोग्याला उत्तम खाणं खावं. मान्य. मग मिसळीची तर्री चाखायचीच नाही का ?

वैचारिक दिवाळखोरी
सचिनची पत्नी अंजली मॅच बघताना गणपती कडे बघतात.
बघू देत. तुमचे काय जाते ? आणि लोकांना हा विषय चघळायचाय, त्यात काय जगबुडी झाली ?
मी कॉलेज मधे होतो तेव्हा परीक्षेला जाताना एकच ’लकी शर्ट’ घालायचो. माझा एक लकी स्टेपलर होता. आणि तेंडुलकर ची बायको पण तेच करते हे ऐकून मला मजा वाटली. इथून तिथून लोक सारखेच. विषय संपला. एवढी आगपाखड कशाला ?

परुळेकर साहेब, ’प्रेम’ म्हणजे काय हे माहीतेय का आपल्याला ? आपलं ज्या व्यक्तीवर, वस्तूवर प्रेम बसतं, त्याबद्दल बोलावं, ऐकावं असं काही वाटत ? मी किशोर कुमार चा चाहता आहे, आणि त्याच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी मला ठाऊक आहेत, ज्या किशोर शी घेणं देणं नसलेल्यांना अजिबात महत्वाच्या वाटणार नाहीत, वा त्या महत्त्वाच्या नसतीलही, पण मला ऐकावयास आवडतात. त्याचा लहरी पणा, तर्हेवाईक वर्तन, तो रेकॉर्डिंग च्या वेळी करायचा त्या गमती, एक ना अनेक.
भीमसेन जोशींना कार दुरुस्त करता येते. याचं त्यांच्या चाहत्यांना अप्रूप आहे. "तसे बरेच मेकॅनिक असतात, ते पण कार दुरुस्त करतात. मग भीमसेन नी केली तर त्यात काय एवढं कौतुक ", विचारा ना आता ! मी मागे एकदा सवाई च्या पटांगणात भीमसेन आणि अजून दोन तीन जणांना गाडीपाशी उभे राहून मसाला दाणे खाताना पाहिले होते, आणि ही गोष्ट मी ’भाबड्या कौतुकाने’ ब-याच मित्रांना सांगितली होती. त्या दिवशी त्याच गाडीवर शेकडो लोकांनी दाणे खाले असतील, तसेच भीमसेन नी. Big deal ! नाही ?


मला सांगा, बालकृष्णाच्या लीला लोक का चघळतात ? घरी लोणी चोरलं. मग ? ते कृष्णावर प्रेम केल्याशिवाय समजणार नाही.

तुम्ही ’विचारवंत’ ना, तुम्ही बुद्धीवादाचं तुणतुणं वाजवा. कृष्णाचं केवळ उदाहरण दिलं ! नाहीतर सचिन ला त्याच्या पंक्तीला बसवून देव केलं म्हणून गळा काढाल.

बर आता पुढचा मुद्द. "देव बनवणं" म्हणजे काय ? आपण देव म्हणून ज्याची पूजा करतो, तो असतो पाषाण. त्यात आपण देव पाहतो. जो खरं तर आपण ’पाहिला’च नाहीये कधी. आपली श्रद्धा, प्रेम, भक्ती व्यक्त करायला काहीतरी माध्यम शोधत असतं मानवी मन. त्याला कधी मूर्तिपूजेचं रूप येतं तर कधी व्यक्तिपूजेचं.

तुम्ही मानवजातीचं भलं करणा-या शास्त्रज्ञांचा विषय काढलाय तर पाहू - अणुबॉंब कसा बनला ? प्रयोग शाळेतच ना ? त्यानं मानवाचं काय भलं झालं ? प्लॅस्टिक कुठे बनलं ? कोणी बनवलं ? परुळेकर साहेब, भलं काय आणि बुरं काय, हा ज्ञानी लोकांनी करायचा निर्णय आहे. तुम्हाला विक्रमादित्याच्या सिंहासनावर बसायचंय ?
आणि थोड्याच वेळापूर्वी तुम्हाला ’नैसर्गिक आणि अभिजात’ गोष्टींचं प्रेम आलं होतें, त्याचं एकदम काय झालं ?

सचिन, विचारवंत, मराठी, मुंबई आणि ...
महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया.
वाचकांनो, माझी एक नम्र विनंती आहे. सचिन ला त्या मुलाखतीत कोणता प्रश्न विचारला, आणि त्याचे उत्तर त्याने काय दिले हे शोधायचा मी आटोकाट प्रयत्न केला. पण ’मुंबई सर्वांची आहे’ असे सचिन कधी म्हणला ते मी ऐकले वा पाहिले नाही. मला ’हे अचूक’ वाक्य हवे आहे. आपणास माहीत असल्यास कृपया मला सांगा.
मला गूगल आणि यू ट्यूब वर सचिनच्या तोंडी एवढेच वाक्य सापडले -
"Mumbai belongs to India. That is how I look at it. And I am a Maharashtrian and I am extremely proud of that but I am an Indian first" .

पहा : http://www.youtube.com/watch?v=7v6dVxyIJE4

पण तो ’मुंबई सर्वांची’ असे म्हणल्याचे मला सापडले नाही. मला जोपर्यंत स्वत:च्या कानांनी हे ऐकायला मिळत नाही तोवर मी प्रतिक्रिया देणार नाही. कारण परुळेकरांनी ज्या माध्यमांवर एवढे तोंडसुख घेतले आहे, त्याच माध्यमांचे एक अजून महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ’शब्द बदलणे’.

तसंच माझ्या दृष्टीने ’प्रश्न’ही महत्त्वाचा आहे. "अचूक प्रश्न काय विचारला" हे कुठेच कसे सापडले नाही कोण जाणे ! कारण प्रश्न काय विचारला हेच ठाऊक नसेल, तर उत्तर कशाला दिले हे कसे कळणार ! प्रश्न ’हरवला’ असेल तर उत्तराचा निम्म्याहून अधिक अर्थ ’हरवतो’ असे माझे ठाम प्रतिपादन आहे. नाहीतर Life, the Universe and Everything = 42 व्हायचे !

सचिन च्या या वाक्याबद्दल मी सुद्धा विशेष खूष नाहीये. ते एवढ्यासाठीच की, आपण मुंबईकर आहोत, महाराष्ट्रियन आहोत, भारतीय आहोत, यांत क्रम लावायची काय गरज आहे ? हा शुद्ध मूर्खपणा आहे.
मी पुणेकर, मराठी, भारतीय, हिन्दू, परशुरामीय (स. प. महाविद्यालय), COEPian , संगणक अभियंता, असं सगळं एकाच वेळी आहे !! आता यात आधी पुणेकर का आधी मराठी का अजून काय काय, हा काय आचरटपणा आहे ? माणूस एकच आहे ! आणि तो हे सर्व काही मिळून बनला आहे ! नंबर लावायला ही काय एस एस सी बोर्डाची मेरिट लिस्ट आहे का काय !

आत सचिन काय म्हणला ते पाहू - "मुंबई भारताची आहे". याचा अर्थ "मुंबई महाराष्ट्राची नाही" असा कसा होतो ? आत या वाक्यात मुंबईच्या ऐवजी इतर काही शहरे घालूया. "बंगलोर भारताचे आहे/ कोलकाता भारताचे आहे". हे वाक्य विचित्र वाटते का ? मला तरी नाही वाटत.
सचिन जे काही म्हणला, त्याचा अर्थ "कोणीही मुंबईत येऊन मुंबईचे वाटोळे करावे/ मुंबईत मराठी ला तिलांजली द्यावी/ मुंबईतून मराठी लोकांना हद्दपार करावे" यांतला कुठलाच होत नाही. किमानपक्षी मला तरी तसे वाटत नाही.

परुळेकर साहेब म्हणतात तसे सचिन ला आपल्या ’इंटरनॅशनल इमेज’ ची काळजी पडली असती, तर ’मंकी/मां की’ प्रकरण त्याने वेगळ्या प्रकारे हाताळले असते. त्या प्रसंगात सचिन च्या प्रामाणिकपणावर संशय घेतला गेला (ऑस्ट्रेलियन टीमकडून), तरीही तो आपल्या भूमिकेवर ठाम राहिला ते काय ’इंटरनॅशनल इमेज’ साठी ? तुमची जीभ तरी असे आरोप करायला धजते कशी ?

खेळ्या आणि विचारवंत
हा तुमच्या उन्मत्तपणाचा कळस आहे. "सचिन ’खेळ्या’ आहे, ’विचारवंत’ नाही". विचारवंत कोणास म्हणायचे ? विचारवंत कोण आहे आणि कोण नाही हे ठरवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ? तुम्ही विचारवंत आहात का ? जगात ’विचारवंत असणे’ आणि ’विचारवंत नसणे’ हे दोनच वर्ग आहेत का ? मधे कोणीच नसते का ? विचारवंत की पदवी (डिग्री) आहे, का परीक्षा आहे का इमेज आहे ? पुस्तके लिहून माणूस विचारवंत होतो का व्याख्याने देऊन ?
माणसाला जनावरांपासून वेगळी काढणारी गोष्ट म्हणजे ’विचार क्षमता’. ती कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाकडे असते. पण विचारवंत हे काही प्रोफेशन नाही. एक माणूस म्हणून सचिन ला विचारक्षमता आहे, आणि त्याहून म्हणजे, भारताचा नागरिक म्हणून त्याला मतं मांडण्याचा अधिकार आहे. त्याने ’मी क्रिकेटर आहे, म्हणून माझे हे मत घ्या’ असे सांगितले नाहीये. लोकांनी ते तसे घेतले तर ती त्यांची चूक आहे.

आपल्याला सचिन साठी ’खेळाडू’ का शब्द न सुचता ’खेळ्या’ हा शब्द कसा सुचला ? तुम्ही कुठल्या विचाराने हा विचित्र, कानावर वार करणारा शब्द वापरलात ते तुम्हीच जाणता. पण सचिन वर टीका करताना पातळी सोडून त्याच्या आवाजावर घसरण्याची गरज नव्हती.

तो मैदानावर बॅटने बोलतो, आणि त्याचा तो आवाज पुरेसा जरब बसवणारा असतो.


"सचिन कर्णधार म्हणुन साफ आपटला" हे वाक्य लिहिताना आपल्या मनात उठणा-या आनंदाच्या ऊर्मी मी समजू शकतो. सचिन कर्णधार म्हणून यशस्वी का झाला नाही याची असंख्य कारणे आहेत, त्याला तो एकटाच जबाबदार नाही आहे. इतर दहा खेळाडू तेव्हा काय करत होते ? मी विजय वा पराजय हा संघाचा मानतो, कर्णधाराचा नव्हे. म्हणूनच, धोनीला कर्णधार म्हणून प्रमाणाबाहेर कौतुक करावयास मला आवडत नाही, टीम मधील इतर खेळाडूंचाही विजयात जबरदस्त वाटा आहे. तसंच, पराजयाचं खापर एकट्या कर्णधाच्या माथी मारणं चुकीचं आहे. याऊपर, सचिन कर्णधार म्हणून पात्र नसेलही. मग ? त्याला ’वैगुण्य’ नाही म्हणत ! तो जगन्मान्य फलंदाज आणि उपयुक्त गोलंदाज आहे. हे पुरेसे नाही ? पण कावळ्यांच्या छिद्रान्वेषी दृष्टीला भलं दिसणार तरी कसं ?


धनी हा धनाचा विश्वस्त
असं कुठल्या ग्रंथी कोणी लिहिले आहे ? मिळवलेल्या धनाचा धनी हा कमाई करणारा असतो. तुम्हाला हवं असेल तर तुमचे पैसे उधळा. हलवायाच्या घरावर तुळशीपत्रे ठेऊ नका ! मग जर धन वाटायचेच असेल, तर मिळवायचेच कशाला ! त्याने मॅच फिक्सिंग करून तर पैसे नाही मिळवलेत ना ? आपण आयकर भरतो. तो भरत नसल्यास चूक आहे. पण आयकर भरणे हे ’समाजाचे देणे चुकविण्याचा प्रयत्न आहे’ असं मला वाटतं. सचिन माझ्यापेक्षा अधिक (बराच ;) आयकर भरतो. त्या बदल्यात त्याला माझ्यापेक्षा अधिक सोयी काय मिळतात ? मी एक्स्प्रेस हायवेने जातो, तो पण. मी मुंबई विमानतळावर जातो, तो पण. मग ? मग तो अधिक आयकर का भरतो ? कारण सचिन आणि मी एकेका गुहेत राहत असतो, तर अम्ही दोघेही कंदमुळे जमवली असती. आम्ही ’समाजात’ राहतो, समाजाला सचिनच्या कलेची कदर आहे म्हणून तो अधिक पैसा कमवतो, आणि कदाचित म्हणूनच तो अधिक आयकर भरतो.

आपण वॉरन बफे चे दिलेले उदाहरण वाचून तर हसू आवरले नाही ! शेअर मार्केट मधे कमवलेला पैसा हा लोकांच्या हातात फिरत असतो. तुम्हाला फायदा होतो, तो दुस-या कोणाच्या खिशातून गेलेल्या पैशातून ! आणि असे - लोकांच्या खिशातून - पैसे कमवून, मग त्यातून फाउंडेशन काढले की तुमच्या सारखे लोक मान डोलावणार !

जे लोक समाज सेवेसाठी पैसा खर्च करतात, ते त्यांचे दातृत्व म्हणून. तो समाजावरचा उपकार आहे. ’ते समाजाचे देणे आहे, ते केवळ विश्वस्त आहेत’ वगैरे म्हणून तुम्ही काय त्यांचा पैसा गृहीत धरताय का काय ? त्यांच्या दानाचा हा धडधडीत अपमान आहे ! एखाद्या माणसाने समाजसेवेसाठी तन-मन-धन खर्चले तर तो मोठा आहेच, पण तसे केले नाही तर त्याला छोटा ठरवण्याचे कारण नाही. सचिन ने त्याचा पैसा खर्च कसा करावा हा त्याचा ’खासगी’ प्रश्न आहे. त्यात नाक न घालणेच उचित.

सचिन ची कार
आपल्या देशात खेळाडूंना काही सवलती वा अलग वागणूक दिली जाते. उदा, अमूक एखाद्या पातळीवर खेळाडू असल्यास गुणांमधे वाढ होते, काही नोक-यांमध्ये खेळाडूंना काही कोटा असतो. जशी ही ’निराळी’ वागणूक देण्याची प्रथा आपणच पाडली आहे, त्यानुसार सचिन ने ’भेट म्हणून’ मिळालेल्या (लक्षात घ्या, विकत घेतलेल्या नाही) गाडीवरील ड्यूटी माफ व्हावी म्हणून प्रयत्न केला असेल.
माझ्या प्रामाणिक मतानुसार सचिन ने हा अनावश्यक वाद निर्माण करण्या ऐवजी नियमानुसार वर्तन केले असते तर त्याने आपल्या वर्तनाने चांगला आदर्श निर्माण केला असता, त्याने तसे करायला हवे होते.
पण या साठी एवढे आकांड तांडव कशाला ? त्याने ड्यूटी माफ करून मागितली, ती त्याला मिळाली नाही, विषय संपला. त्याने कायदा तोडला नाही ना ?

कोका कोला
कोका कोला पिणे जर चुकीचे असेल तर त्याचे उत्पादन बंद करा. ते करायचे नसेल तर तोंड बंद ठेवा, लोकांना निर्णय (चुकीचा वा बरोबर) घेऊ दे. म्हणजे कोका कोला ला उत्पादनास परवानगी द्यायची, लोकांनी ते ढोसायचे, आणि सचिन ने त्याची जाहिरात केली की त्याच्या नावाने खडे फोडायचे ! उत्तम न्याय आहे. बर, मगाशी ’सचिन कर्णधार म्हणून आपटला’ याचे चर्वित चर्वण करताना तुम्हाला गांगुली आठवला. तो नाही का जाहिराती करत ? आता नाही तो आठवला ? आता गोपीचंद सापडला.

म्हणजे काय, तुम्हाला सचिन सर्वगुणसंपन्न हवाय. आता मला सांगा, सचिन कडून देवत्वाची अपेक्षा कोण करतंय? त्याला ’आहे तसे स्वीकारणारे, त्याच्यावर प्रेम परणारे चाहते’, का ’त्याच्यामधे थोडे दोष आहे’ म्हणून ओरडणारे तुम्ही ?

बहुमत
आपण आपल्या पहिल्या लेखात म्हणलंय,
"अर्थात बहुसंख्य जनतेचे मत तसे नसेलही. परंतु हल्ली सवंगतेच्या नाही लागलेली माध्यमं बहुसंख्य जनतेच्या मताला फाट्यावर मारतात".

आणि दुस-या लेखात म्हणलंय,
"... तुकोबाच्या गाथाही बहुमताने बुडवण्यात आल्या होत्या ... तुकोबाने तर म्हणलेलेच आहे, सत्य आणि बहुमताचा काय संबंध?"

आता ही दोन वाक्ये नीट वाचा :) जरा आपल्याच दोन विधानांमधली विसंगती तपासून पाहिली असती तर बरे झाले असते। सचिन च्या डोळ्यांतली कुसळे पहायच्या आधी आपले विचार जरा तपासून पहा.


सचिन च्या बाबतीत जाणवणारी एक गोष्ट म्हणजे, काही लोक, त्याने काय केले आहे याकडे अचूक दुर्लक्ष करून ’त्याने काय केलेले नाही’ एवढेच पाहण्यात धन्यता मानतात. त्या लोकांच्या दु:स्वासी कंपूत जाऊन मिळाल्याबद्दल अभिनंदन ! सचिन ने मराठी माणसाचा गळा कापला आहे की नाही ते तुमचे तुम्ही ठरवा, पण मराठी माणसाविरुद्ध कोत्या मनाने उगाच गरळ ओकून आपण ’मराठी’ आहोत हे मात्र तुम्ही छान सिद्ध केलंय !

शेवटी तिखट शब्दांत आपणास एक अनाहूत सल्ला देतो - "पायरी ओळखून रहा. सूर्यावर थुंकायला गेलात तर तुमचेच हसे होईल".