December 17, 2004

VERITAS !!

एक अनामिक हुरहूर मनात दाटून आली आहे. लवकरच 'आडनाव' बदलून 'सासरी' जायचे आहे ! तसे स्थळ एक महिन्यापूर्वीच सांगून आले होते, पण 'देण्याघेण्याची बोलणी' चालू होती. मला कोणतीच कल्पना नव्हती ! दोन दिवसांपूर्वी कुणकुण लागली, आणि काल कळले की 'रिश्ता पक्का झाला' ! आता मनाची तयारी करत आहे !
फार कोड्यात टाकत नाही.

Symantec Corp. and VERITAS Software Corp. today announced a definitive agreement to merge in an all-stock transaction. The merger will lead to the creation of one of the world's largest software firms, which will trade under the name Symantec...

शेक्सपिअरने जरी म्हटले आहे "नावात काय आहे?", तरी नावात बरेच काही असते ! VERITAS या कंपनीला आणि नावाला माझ्या विश्वात खूप महत्त्वाचे स्थान आहे. आयुष्यातला पहिला वहिला जॉब ! माझ्या आयुष्यात एक प्रदीर्घ कालखंड असा होता, की जेव्हा घडणारी प्रत्येक गोष्ट विरुद्धच जात होती. फसवणूक, अपमान, अन्यायाविरुद्धची चीड, संताप, असहायता, वैफल्य, अपेक्षाभंग, नैराश्य यांच्या वावटळीत मी सापडलो होतो. या कालावधीत मनाला आनंद वाटावा अशी घडलेली एकमेव गोष्ट म्हणजे माझी कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये VERITAS मध्ये झालेली निवड... Joining Date ची मी अगदी चातकासारखी आतुरतेने वाट पाहत होतो. पुणे युनिव्हर्सिटीच्या Computer Engg नामक यमपुरीतील नरकयातनांपासून सुटून आपण केव्हा एकदा ही नोकरी सुरू करतो असे वाटत होते...

नव्या कंपनीत रुळायला थोडा वेळ लागला. नवे ऑफिस, नवे सोबती, नवे काम. मी ज्या सुमारास join झालो, तो मोठा 'कठिण समय' होता ! अवास्तव कल्पनांचा फुगा टाचणी लागून फुटल्यावर 'IT' ला एक जबरदस्त झटका बसला होता. आजूबाजूला ले ऑफ, पगार कपात, कंपन्या बंद पडणं हेच ऐकू येत होतं. काम करताना मनावर एक दडपण असायचं. पण हळूहळू परिस्थितीत सुधारणा होत गेली. साडेतीन वर्षांत मी पक्का 'Veritian' बनलो. हसत-खेळत कामात काळ कसा लोटला ते कळलंच नाही !

आता कंपनीचं नाव बदलेल. इतरही काही गोष्टी बदलतील.
माझ्या मनाचा 'VERITAS' साठी राखून ठेवलेला एक कोपरा मात्र तसाच राहील.

December 15, 2004

दोन सूर्य

माझ्या ललाटी परमेश्वराने दोन सूर्यांच्या तेजाने नाहून निघण्याचे भाग्य लिहिले... पैकी एका सूर्याच्या उदयाचा मी साक्षीदार होतो, तर माझा जन्म झाला तेव्हा दुसरा सूर्य दिव्य तेजाने माथ्यावर तळपत होता. आता एक सूर्य माथ्यावरून ढळला आहे, तर दुसरा पश्चिमेकडे कलला आहे. दोघांसही भारताचे प्रतिष्ठेचे पद्म पुरस्कार मिळाले आहेत. दोन्ही सूर्यांनी आपल्या तेजाने आपापल्या सूर्यमालांना उजळून टाकले आहे.

पहिला सूर्य आहे - सचिन तेंडुलकर. मी पाचवीत असताना सचिनची कारकीर्द सुरू झाली. या गुणी खेळाडूच्या नावावर किती विक्रम आहेत देव जाणे ! आपल्या विलक्षण आकर्षक, वेगवान खेळाने सचिनने क्रिकेट रसिकांची मने जिंकून घेतली. मागच्या विश्वचषकातील पाकिस्तान विरुद्धचा सामना आठवून अजूनही मान ताठ होते !
हल्ली मात्र त्याचा खेळ हा 'सचिन'चा खेळ राहिला नाही अशी टीका ऐकू येते. त्याच्या खेळाच्या शैलीत काहीसा फरक झाला आहे. हा बदल वयानुसार स्वाभाविकच आहे. पण प्रेक्षकांना ते मान्य नसावे ! त्याला दुखापतीनेही सतावले. परंतु या सर्वांवर मात करत त्याने नुकताच कसोटी शतकांचा विक्रम गाठला.

दुसरा सूर्य आहे - स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी.भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात आपल्या गुणवत्ता आणि तपस्येच्या जोरावर अढळपद प्राप्त केलेला हा सुरांचा बादशहा !परवाच ५२ व्या 'सवाई गंधर्व' महोत्सवात त्यांचे गायन ऐकण्याचा योग आला. त्यांनीच लावलेल्या रोपट्याचे आज या महोत्सवरूपी वृक्षात रूपांतर झाले आहे. काही वर्षांपूर्वी त्यांची एक अवघड शस्त्रक्रिया पार पडली. ८० वर्षांचा हा तपस्वी जेव्हा गायला बसला, तेव्हा माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले...
ते कसे गातात याच्याशी मला कर्तव्य नव्हते. ते गाताहेत, आणि मला त्यांचा प्रत्येक स्वर कानांत साठवून घ्यायचा आहे एवढेच मला माहीत होते. पहिली दहा मिनिटे झाली आणि पंडितजींचा स्वर लागला. बंदुकीच्या गोळीसारखा सणाणत जाणारा तो आवाज आज ऐशीव्या वर्षीही टिकून आहे. काही कौतुकाचे आणि आनंदाचे क्षण शब्दांत नीट वर्णन करता येत नाहीत. आनंदाश्रू ते काम उत्तम करतात !

या दोन्ही सूर्यांना माझा नम्र प्रणाम !